गणेश विसर्जनाच्या नव्या संकल्पनेला डोंबिवलीत मिळाला प्रतिसाद

डोंबिवली : सांस्कृतिक डोंबिवलीत नव्या संकल्पना रुजण्यास मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असतो. एकमेव उदाहरण म्हणजे नववर्ष स्वागतयात्रा. याच धर्तीवर गणेश विसर्जनाबाबत नवी संकल्पना उदयास आली असून डोंबिवली औद्योगिक विभागातील गणेश भक्तांनी गणेशाचे विसर्जन खाडी, तलाव आदी पाणवठ्याच्या ठिकाणी न करता आपल्या स्वत:च्या घरासमोरील पाण्याचा ड्रम किंवा बादलीत केले. विसर्जनाच्या या नव्या संकल्पानेमुळे हा विषय शहरात चर्चेचा झाला आहे. या संकल्पनेला काही प्रमाणात प्रतिसाद मिळाल्याने प्रशासनही या बद्दल सकारात्मक विचार करण्याच्या विचारात आहे.

गणेश विसर्जनासाठी पालिकेच्या माध्यमांतून विविध सोयी-सुविधा कराव्या लागतात. नैसर्गिक तलाव, खाडी आणि कृत्रिम तलावांची व्यवस्था उभी करावी लागते. दीड, पाच आणि अनंत चतुर्थी या दिवशी गणेश विसर्जनासाठी प्रशासनाला जागरूक राहावे लागते. विसर्जना दरम्यान रस्त्यांवरील वाहतूक कोंडी, ध्वनिप्रदूषण या समस्यातून सर्वच गणेश भक्तांना सामोरे जावे लागते. विशेष म्हणजे गणेश विसर्जनानंतर दुसऱ्या दिवशी खाडीकिनारी मन सुन्न करून टाकणारी स्थिती गणेश भक्तांना दुखः देणारी असते. गणेश विसर्जन दरम्यान होणारी रेटारेटी, यामधून होणारे वृद्ध-लहान मुलांचे हरवणे ही नित्याचीच बाबा होत असते. यावर मात म्हणून डोंबिवली औद्योगिक विभागातील काही मंडळीनी नवी संकल्पना आणली. समाजसेवक राजू नलावडे यांच्या प्रेरणेने विसर्जनाची नवी संकल्पान उदयास आली. गणेश भक्तांनी आपापल्या गणपतीचे विसर्जन आपल्या घरीच करा. घराच्या समोर पाण्याने भरलेल्या बादलीत किंवा ड्रम मध्ये गणपतीचे विसर्जन करा. विसर्जनानंतर ते पाणी झाडांना टाका आणि उरलेली माती पुन्हा गणपती मूर्तीकारांच्या स्वाधीन करा. अशा या संकल्पनेला डोंबिवली औद्योगिक विभागातील गणेश भक्तांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला असून सुमारे 65 गणेश भक्तांनी आपल्या गणेशाने या पद्धतीनी विसर्जन केले. अशा प्रकारे आम्हीही आमच्या गणेशा विसर्जन केल्यामुळे प्रदूषण मुक्त विसर्जन झाल्याचा आनंद झाला अशी प्रतिक्रिया राजू नलावडे यांनी दिली. तर कल्याण डोंबिवली महानगर पालिकेचे उपायुक्त धनाजी तोरस्कर म्हणाले, आम्ही आमच्या गणपतीचे विसर्जनही याच पद्धतीने केली. ही संकल्पना अतिशय चांगली असून याबाबत प्रबोधन होणे गरजेचे आहे. पालिकेच्या माध्यमातून यावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केला जाईल. जेणेकरून विसर्जन दरम्यान वाहतूक कोंडी आणि प्रदूषण कमी होण्यास मदत होतील.