डोंबिवली : सोमवारी गणेश चतुर्थीच्या निमित्ताने घरोघरी आणि सार्वजनिक उत्सव मंडळांमध्ये गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली. मनोभावे पूजाअर्चा केल्यानंतर डोंबिवलीत मंगळवारी सुमारे दहा हजार दीड दिवसांच्या गणपतींचे विसर्जन करण्यात आले. ‘गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर’ म्हणत गणेश भक्तांनी बाप्पाला निरोप दिला.
शहरात तसेच ग्रामीण भागात गणेश विसर्जनासाठी विविध ठिकाणी नैसर्गिक तलावांसह कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आली होती. पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने कृत्रिम तलावात विसर्जन करण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं.
कल्याण डोंबिवली विभागात शनिवारपासूनच संततधार सुरु असणाऱ्या पावसाने सखल भागात पाणी साचल्याने अनेक ठिकठिकाणी गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी जाणाऱ्या गणेश भक्तांना अनेक अडचणीचा सामना करावा लागला होता.
पूर्वेकडील विष्णूनगर पोलीस ठाणे हद्दीत जुनी डोंबिवली, मोठागांव, देवीचापाडा, गणेशनगर आणि कोपरगांव अशा पाच ठिकाणी बाप्पाच्या विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली असून यामध्ये दोन कृत्रिम तलावांची सुविधा केली होती. रामनगर पोलीस ठाणे अंतर्गत संगीतावाडी, बालाजी गार्डन, आयरेगांव, चोळेगांव आणि पंचायत बावडी या ठिकाणी गणेश विसर्जनाची व्यवस्था होती. टिळकनगर पोलीस ठाणे अंतर्गत अयोध्यानगरी, भोईरवाडी, वीर सावरकर रोड, टिळकनगर ठिकाणी तीन कृत्रिम व एक नैसर्गिक तलावांमध्ये गणपतीचे विसर्जन झाले. मानपाडा पोलीस ठाणे अंतर्गत पिसवली, गोळीवली, लोढा हेवन, भोपरगांव, देसाई नदी अशा चौदा ठिकाणी बाप्पांचे विसर्जन झाले.