डोंबिवली : लोढा हेवन परिसरात दरवर्षी प्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक, गावदेवी चौक तसेच अनेक सोसायटीच्या आवारात पावसाळ्यात तुडुंब पाणी भरत असते त्यामुळे रहिवाशांना दरवेळी पावसामुळे पाणी तुंबल्याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. तशीच परिस्थिती झाल्याने येथील नागरिक हवालदिल झाले आहेत.
लोढा हेवन परिसरातील गटारे, नाले व्यवस्थित साफ न केल्याने यावर्षी त्याचा नाहक त्रास नागरिकांना होत असल्याची बोंब विभागात आहे. गुरुवारी सकाळ पासूनच अनेक नागरिकांनी सोसायटीच्या आवारात पाणी साचले असल्याच्या तक्रारी नागरिक अधिकाऱ्यांना करीत आहेत. येथे अनेक असुविधांचा अभाव असलेले हे कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील संकुल आहे की नाही असे अनेकांना वाटते याची चर्चा सुद्धा असते. त्यामुळे नागरिकांचा आक्रोशाची दखल महापालिका प्रशासन आणि महापालिका आयुक्त आता तरी घेतील का ? एकदा तरी महापालिका आयुक्तांनी हेवन परिसरातील नागरी व्यवस्थेबाबतीत पाहणी करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी लोढाहेवन परिसरातील नागरिक करीत आहेत.