( परिसंवादात उमटले साहित्यिकांचे सूर )
डोंबिवली : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे मरगळ झटकली गेली असून, आता तंत्रज्ञानासह जगातील सर्व उत्तमोत्तम ज्ञान मराठीत रुपांतरीत करण्याची आवश्यकता आहे. तसेच मराठी ही ज्ञानभाषा व रोजगाराची भाषा व्हावी, यासाठी राज्यकर्त्यांसह सर्व समाजाने एकसंघपणे प्रयत्न करण्याची गरज आहे असे मत आगरी महोत्सवात आयोजित केलेल्या परिसंवादात काल व्यक्त करण्यात आले. मराठी माणसाने न्यूनगंड बाळगू नये. तसेच मराठीचा नव्या पिढीत प्रसार करण्यासाठी शाळांमधील ग्रंथालये समृद्ध करावीत असाही मतप्रवाह परिसंवादात व्यतीत करण्यात आला.

महापालिकेच्या हभप संत सावळाराम महाराज क्रीडासंकुलात विसाव्या अखिल भारतीय आगरी महोत्सव अंतर्गत आयोजित मराठी भाषा-अभिजात भाषा दर्जा-अभिमान आणि जबाबदारी या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. यावेळी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी, ९१ व्या मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत देशमुख, पुणे येथील महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या डोंबिवली शाखेचे कार्याध्यक्ष सुरेश देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते. पत्रकार राजेंद्र हुंजे यांनी संवाद साधत उपस्थित सहभागी वक्त्यांना या विषयावर बोलते केले.

अभिजात भाषेचा दर्जा मिळविण्यासाठी खूप मोठा संघर्ष करावा लागला अशी खंत डॉ. श्रीपाद जोशी यांनी व्यक्त केली. परंतु यापुढे मराठी ही ज्ञानाची भाषा करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला पाहिजेत. सर्व ज्ञान मराठीत आल्यास मराठीची प्रगती होईल, असे मत डॉ. जोशी यांनी व्यक्त केले. देशातील ४० टक्के मुले ही इंग्रजीत शिक्षण घेत आहेत. मात्र, कोणत्याही भाषेत शिक्षण घेतल्यास रोजगार मिळू शकतो.
तर . लक्ष्मीकांत देशमुख यांनी सांगितले की, आजच्या गुगल ट्रान्सलेट युगात भाषांतरातून आपण अन्य भाषिकांबरोबर संवाद साधू शकतो. मराठी शाळांमध्ये उत्तम मराठी व उत्तम इंग्रजी व्यवस्था दिली पाहिजे. यापुढे संपूर्ण उच्च शिक्षण मराठीतून उपलब्ध केले जाईल.

एकेकाळी मराठीला अभिजात भाषा करण्यासाठी विरोध झाला होता. त्यावेळी ५०० कोटी रुपयांवर साहित्यिकांची नजर असल्याचा आरोप केला गेला. प्रत्यक्षात गेल्या काही वर्षात २८ हजार लोक बोलत असलेल्या संस्कृतला २६२ कोटी रुपये, तर इतर भाषांना केवळ ६४ कोटी रुपये मिळाले. मल्याळम भाषेला एक रुपयाही मिळाला नाही असे मिलिंद जोशी यांनी सूचित करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. ते म्हणाले, राजकीय इच्छाशक्ती वापरुन मराठी भाषेसाठी निधी आणण्याचे आवाहन राज्यकर्त्यांनी केले पाहिजे. मोठ्या संख्येने असणाऱ्या महामंडळांची नावे इंग्रजी व मराठीत आहेत ही परिस्थिती बदलून फक्त मराठीतच नांवे असण्यावर भर दिला पाहिजे असे मत सुरेश देशपांडे यांनी व्यक्त केली. अनेक प्रगत देशांची भाषा इंग्रजी नाही तरीपण ते प्रगत देश म्हणून ओळखले जात आहेत. मराठी समृद्ध होण्याबरोबरच बोलीभाषांसुद्धा समृद्ध झाल्या पाहिजेत असेही विचार परिसंवादातून मांडण्यात आले.

डोंबिवलीत भरविणार आगरी भाषा साहित्य संमेलन :
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे यशस्वी आयोजन करणाऱ्या आगरी यूथ फोरमने आगरी भाषेच्या प्रसारासाठी आगरी साहित्य संमेलन भरवावे, अशी सूचना परिसंवादात सहभागी वक्त्यांनी केली असता आगरी यूथ फोरमचे अध्यक्ष गुलाब वझे यांनी आगरी साहित्य संमेलन निश्चित करणार असल्याची घोषणा केली.